पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून, मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. शहरी भागामध्येही घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ‘संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे पंचनामे करावे,’ असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फतदेखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तत्काळ कार्यवाही करून प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.
राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
नुकसानीबाबत काही शंका असल्यास टोल फ्री क्रमांक १०७७ आणि पुणे येथील आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२०-२६१२३३७१ येथे संपर्क करावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.